भीम बांधावर पर्यटक महिला पाण्यात बुडाल्याने मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांचा अभाव ठरतोय जीवघेणा
पालघर!डहाणू तालुक्यातील वाघाडी गावाजवळील प्रसिद्ध भीम बांधावर गुरुवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. मीना पऱ्हाड (वय ३९, रा. धानिवरी, डहाणू) या महिला पर्यटकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे १८ तासांच्या अथक शोधानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. मीना पऱ्हाड या आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी भीम बांधावर आल्या होत्या. त्यांनी अचानक पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे त्या खोल पाण्यात ओढल्या गेल्या आणि काही क्षणातच दिसेनाशा झाल्या.
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि पाणबुड्यांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडला आणि कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
भीम बांध हे डहाणू तालुक्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून दररोज येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. मात्र, या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याचे कटू वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. पाण्याचा प्रवाह तीव्र असून खोली ४० ते ५० फूट असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. येथे चेतावणी फलक, जलरक्षक वा सुरक्षारक्षकांची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
यापूर्वीही भीम बांधावर अशा स्वरूपाचे अपघात घडले असून मृत्यूच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून आजतागायत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.
स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी या घटनेनंतर जोरदार संताप व्यक्त केला असून भीम बांधासारख्या पर्यटनस्थळी तात्काळ चेतावणी फलक लावणे, प्रशिक्षित जलरक्षक नेमणे आणि सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे, अशी मागणी केली आहे.
\"निसर्गसंपन्न पर्यटनस्थळांवर नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपण्याची गरज असली, तरी प्रशासनानेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येणार नाही,\" अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.