बोईसर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. ह्या करिता बोईसर विधानसभेच्या आमदाराने दिले पोलीस अधीक्षकांना पत्र
पालघर - बोईसर मध्ये ७ मे व ८ मे या सलग दोन दिवस दोन गटातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खुले आम हातात कोयता , कुऱ्हाडी घेऊन शहरात दहशत मजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत . अशा प्रकारचे निवेदन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून बोईसर(तारापूर) ओळखले जाते. नोकरी , व्यवसाया निमित्त देशातील अनेक राज्यातील नागरिक बोईसर येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात बोईसर मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सलग दोन दिवस कोयते ,कुऱ्हाडी घेऊन बोईसर मधील वातावरण दूषित केले होते. पोलीस दलाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्वरित गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी .पोलीस प्रशासनाकडून अजूनही या प्रकरणावर कारवाई झाली नसल्याने महिला शाळकरी मुले विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस योग्य पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अशी दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी पत्रामध्ये केली आहे.
औद्योगिक कारखान्यात बेकायदेशीर भंगार, केमीकल माफिया, चरस, गांजा या सारखे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. गुन्हेगारावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त आहेत. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य पावले उचलावीत व योग्य ती कार्यवाही करून नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.