कारखान्यात करंट लागून ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
बोईसरप्रतिनिधी : बोईसर दांडीपाडा येथील रहिवासी व रेल्वे स्थानक परिसरात नाका कामगार म्हणून काम करणारा ३० वर्षीय राज पंडित याचा के.जी.एन. फार्मास्युटिकल कारखान्यात करंट लागून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. या अपघातामुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदार रूपेश महाले यांच्या सांगण्यावरून पंडित यांनी कारखान्यातील प्रवेशद्वार तोडून मोठे करण्याचे काम ब्रेकरच्या सहाय्याने सुरू केले होते. काम आटोपल्यावर ब्रेकरला जोडलेली विद्युत पुरवठ्याची वायर आवरण्याच्या प्रयत्नात पंडित यांना अचानक तीव्र विद्युत धक्का बसला.
कारखाना बंद असल्याने घटनास्थळी तातडीने कोणीही मदतीला धावून येऊ शकले नाही. त्यामुळे काही वेळ ते तडफडत राहिले आणि जागीच मृत्यू झाला. सकाळी सुमारे ११.३० वाजता पंडित यांना वरद मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पुढील तपास बोईसर पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, औद्योगिक क्षेत्रात याच महिन्यात अशा प्रकारची ही चौथी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा संचलन विभागाचे अधिकारी नेमके काय काम करतात, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व कामगार संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.