नागझरी ते किराट रस्त्याचे निकृष्ट काम! सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप! नागरिकांमध्ये तीव्र संताप

   

नागझरी! पालघर तालुक्यातील नागझरी ते किराट दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याची दुरवस्था दिसून येत असून, भविष्यातील संभाव्य अपघात व सार्वजनिक जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

     स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रस्ता मंजूर होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास अनेक वर्षे लागली. मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रस्ता उखडलेला असून, त्यावर खडी व माती यांचे योग्य मिश्रण न करता सुमार दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.

 अधिकाऱ्यांची टाळाटाळ, जबाबदारी कोणीही स्वीकारायला तयार नाही
     या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. काही अधिकाऱ्यांनी रस्त्याची एक बाजू चांगली आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन प्रभावी आहे अशा पोकळ प्रतिक्रिया दिल्या. मात्र, रस्त्याच्या सध्याच्या वाईट अवस्थेस जबाबदार नेमका कोण, याचे उत्तर कोणीही देऊ इच्छित नाही.

 कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
     या सगळ्या प्रकारामागे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमधील साठगाठ असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. काही स्थानिकांनी आरोप केला की, टक्केवारीच्या (कमिशनच्या) गणितावर आधारित ठेके दिले जात असल्यामुळे प्रत्यक्ष कामात दर्जा राहात नाही. पाच, दहा किंवा पंधरा वर्षांनी रस्त्याचे काम मंजूर होऊनही अशा सुमार कामामुळे सरकारी निधी वाया जात आहे.

 प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप शिगेला
     या प्रकरणाकडे प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष अधिकच धोकादायक असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक प्रवासी आणि ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 जनतेची मागणी – जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
     रस्त्याच्या कामात झालेला हलगर्जीपणा आणि त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे भविष्यात अनेक अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता जनतेच्या स्तरावरून होत आहे.

    Post Views:  156

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999