पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख विशेष सेवा पदकाने सन्मानित
पालघर (प्रतिनिधी) – शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि निर्धार यांचे उत्तम उदाहरण ठरलेले पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख (भापोसे) यांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (भापोसे) यांच्या हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.
गडचिरोली या नक्षलग्रस्त आणि आव्हानात्मक जिल्ह्यात तब्बल २ वर्षे ६ महिने कार्यरत राहून देशमुख यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना प्रभावी आळा घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी अनेक धाडसी मोहिमा राबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील कारवाईंमुळे नक्षल चळवळीच्या हालचालींवर निर्णायक परिणाम झाला.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी हा सन्मान जाहीर होताच पालघर जिल्हा पोलीस दल आणि नागरिकांमध्ये अभिमानाची लहर पसरली. जिल्ह्याला शौर्याची ओळख करून देणारे आणि निस्वार्थ सेवेमुळे प्रेरणास्थान ठरलेले देशमुख यांचा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.